नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याची घोषणा केली. या मोठ्या घोषणेनंतर आता सरकार कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने तयारीला लागल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कर्मचा-यांच्या कामाचे तास वाढण्याची दाट शक्यता आहे. कर्मचा-यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा केंद्राचा विचार असून त्यासाठी अध्यादेश काढला जाऊ शकतो.
मोदी सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे राज्य सरकारला कर्मचा-यांचे तास वाढवण्याचे अधिकार मिळतील. कामाचे तास किती वाढवायचे याचा निर्णय सर्वस्वी राज्यांना असेल. यासाठी केंद्र सरकारचे कामगार मंत्रालय ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कन्डिशन्स विधेयक आणेल. त्यामुळे राज्य सरकार किंवा संबंधित प्रशासनाला कामाचे तास ठरवण्याचा अधिकार मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी, मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परतले आहेत. लॉकडाऊननंतर हा कर्मचारी वर्ग तातडीने कार्यालयांमध्ये, कारखान्यांमध्ये रूजू होणार नाहीत. त्यासाठी काही दिवसांचा कालावधी जावा लागेल. त्यामुळे कर्मचा-यांचा तुटवडा आणि त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कामाचे तास वाढवले जावेत, अशी मागणी कंपन्या, उद्योग आणि संस्थांच्या प्रमुखांनी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारने अध्यादेश काढण्याची तयारी सुरू केली.
0 Comments